Saturday, December 17, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन!!


  देवरुख वार्ताहर:
  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “ चेंजिंग टेक्नॉलॉजी अॅंड रुरल डेव्हलपमेंट ” या विषयावर शोधनिबंध परिषदेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण विकासामध्ये तंत्रज्ञानाचा सहभाग अधोरेखित करणाऱ्या या परिषदेमध्ये विविध महाविद्यालयातील ४० शोधनिबंध मांडण्यात आले.परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने,सौ.नेहाजी माने,प्रमुख अतिथी आणि मूलतत्त्व व्याख्याते प्रा.नरेंद्र काटीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,आयोजक प्रा. लक्ष्मण नाईक,सह आयोजक प्रा. मुश्ताक गडकरी तसेच तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील उपस्थित होते.

  याप्रसंगी आयोजक प्रा. नाईक यांनी  प्रास्ताविकामध्ये आयोजनाचा हेतू विषद केला.आपल्या स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी उद्योग आणि शिक्षण संस्था यांच्यामधील दरी कमी करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे सांगितले.व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्याचा मानस प्राचार्य भागवत यांनी व्यक्त केला.त्यानंतर प्रा. गडकरी यांनी  प्रमुख अतिथींची ओळख उपस्थितांना करून दिली.
   
  प्रमुख अतिथी श्री.काटीकर यांनी महाविद्यालयाने परिषद आयोजनासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान या परिषदेच्या मुलतत्वासंदर्भात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना
अभियांत्रिकी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर त्यांच्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून,समाजोपयोगी गोष्टींसाठी करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये  संस्थाध्यक्ष श्री.रवींद्र माने यांनी ग्रामीण विकास हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगितले. ग्रामीण विकासामध्ये राहणीमान,शिक्षण,आरोग्य आदी विषयांवरती चर्चा होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

  त्यानंतर विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांचे शोधनिबंध दोन दिवशीय सत्रांमध्ये सादर करण्यात आले.याकरिता तज्ञ परीक्षक म्हणून फिनोलेक्स महाविद्यालयाचे डॉ.मिलिंद किरकिरे,प्रा. मिलिंद यादव, एसएसपीएम कणकवली महाविद्यालयाचे प्रा. एस.एस.मुल्ला व डॉ.बाणे उपस्थित होते. परिषदेमध्ये सादर झालेले शोधनिबंध IOSR जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत.

  उत्तरार्धामध्ये निरोपसमारंभामध्ये मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. याप्रसंगी डॉ.महेश भागवत, डॉ.मिलिंद किरकिरे,प्रा. मिलिंद यादव,प्रा. बाणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.सूत्रसंचालन प्रा.मनोज सादळे तर आभार प्रदर्शन समन्वयक प्रा.पांडुरंग मगदूम यांनी केले.


   

Thursday, December 8, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम-संगमेश्वर तालुकास्तरीय गणित शिक्षकांसाठी कार्यशाळा!!


फोटो: उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने, पुणे येथील प्रथितयश एम.प्रकाश अॅकॅडमीचे गणित तज्ञ श्री. एम.प्रकाश, रत्नागिरी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री.किरण लोहार, संगमेश्वर तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष श्री.काळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, विभागप्रमुख प्रा.सातपुते

देवरुख वार्ताहर:
   आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये संगमेश्वर तालुकास्तरीय गणित शिक्षकांसाठी शालेय गणित अभ्यासक्रमाशी मैत्री या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने, पुणे येथील प्रथितयश एम.प्रकाश अॅकॅडमीचे गणित तज्ञ श्री. एम.प्रकाश, रत्नागिरी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री.किरण लोहार, संगमेश्वर तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष श्री.काळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, विभागप्रमुख प्रा.सातपुते,प्रा.राम दराडे,ठाकरे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.नलावडे सर उपस्थित होते.
   याप्रसंगी प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांना या विषयाची आवड निर्माण व्हावी याकरता गणित शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे हा हेतू डोळ्यासमोर ठेउन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असे सांगितले.तसेच विभागप्रमुख प्रा.संजय भंडारी यांनी तज्ञ प्रशिक्षकांची ओळख करून दिली.याप्रसंगी बोलताना शिक्षणाधिकारी श्री.लोहार यांनी अशा कार्यशाळा आयोजित करून महाविद्यालयाने समाजाप्रती दाखवलेल्या बांधिलकीचे कौतुक केले.गुण आणि गुणवत्ता यामधील फरक अधोरेखित होण्यासाठी या कार्यशाळांची निकड असल्याचे स्पष्ट केले. संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गणित विषयाचे आयुष्यातील महत्त्व विषद केले.कोकणातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अशाप्रकारच्या कार्यशाळा जिल्हास्तरावर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
   प्रमुख पाहुणे एम.प्रकाश यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गणित हा विषय सोपाही नाही अन् अवघडही नाही ,ज्याला समजला त्याला सोपा अन नाही समजला तर अवघड इतकी साधी अन् समर्पक मिमांसा केली. एम.प्रकाश अॅकॅडमी ही भारतातील एक प्रथितयश संस्था असून विशेष बुद्धिमापन विद्यार्थ्यांना आय.आय.टी.जे.ई.ई. चे ट्रेनिंग देते.तसेच ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणित ऑलिम्पियाड ह्या स्पर्धापरीक्षेसाठीही मार्गदर्शन करते.
   त्यानंतर ह्या अॅकॅडमीचे संस्थापक श्री.एम.प्रकाश ह्यांनी स्वत: तज्ञ प्रशिक्षक म्हणून दोन सत्रांमध्ये दिवसभर गणित विषयाच्या शिक्षकांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेसाठी संगमेश्वर तालुक्यातील विविध विद्यालयातील ‘५०’ गणित शिक्षकांनी व त्या शाळेतील गणितातील एका हुशार विद्यार्थ्याने आपला सहभाग नोंदवला.या कार्यशाळेचे आयोजन करताना शिक्षकांबरोबर प्रत्येक माध्यमिक विद्यालयातील गणितातील हुशार विद्यार्थ्याला सहभागी करून घेण्यात आले होते.त्याकरिता संगमेश्वर तालुक्यातील सर्व विद्यालयामध्ये श्री.एम.प्रकाश यांनी तयार केलेली विशेष प्रश्नपत्रिका पाठवून त्याआधारे सहभागी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
   हि कार्यशाळा महाविद्यालयाच्या अॅप्लाईड सायन्स विभागाने आयोजित केली.कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.शिल्पा फलटणे तर आभारप्रदर्शन प्रा.मनोज सादळे यांनी केले.